’चारित्र्य’ जपणारे महापुरुष: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैवाहिक जीवनाची सुरुवातीची वर्षे अत्यंत हलाखिमध्ये व गरिबीत गेली. त्यांच्या पत्नी रमाबाई मोठ्या उदार मनाच्या व पतीला सदोदित साथ देणार्या होत्या. दलित-बहुजन समाजाला न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी बाबासाहेबांनी सुरू केलेल्या अथक संघर्षामुळे बाबासाहेब स्वता:च्या प्रपंचाकडे फारसे लक्ष देऊ शकले नाहीत. पण, आपल्या पत्नीवर त्यांचे अपार प्रेम होते. रमाबाईंनी आपल्याला सांभाळले, याची सारखी जाणीव त्यांना राहत होती.
२५ मे १९३५ रोजी रमाबाईंचं दुख:द निधन झाले. रमाबाईंच्या मृत्यूनंतर तेरा वर्षे बाबासाहेब अविवाहित राहिले. उच्च रक्तदाब व मधुमेह अशा दुर्धर विकाराने त्यांना ग्रासले होते. आयुष्यभरच्या संघर्षाने त्यांची प्रकृती कमालीची खालावली होती. बाबासाहेबांच्या प्रकृतीची सतत काळजी घेणारी एखादी स्त्री त्यांच्या जवळ असावी, असे त्यांच्या कार्यकर्त्यांना सतत वाटत होते.
तसे बाबासाहेब इंग्लंडला १९२० ते १९२३ या कालखंडात शिकायला गेले होते. तेव्हा फ्रेनी फ्रेनझाइज नांवाची एक आंग्ल विधवा युवती एक संवेदनशील मैत्रिण, एक जवळची सल्लागार म्हणून त्यांच्या जीवनामध्ये आली होती. ती हॉऊस ऑफ कॉमन्स मध्ये सेक्रेटरी होती. तिचा बाबासाहेबांशी बराच पत्रव्यवहार झाला होता.
१९३७ मध्ये तर बाबासाहेब इंग्लंडला गेले असतांना त्यांनी, ’या इंग्लिश विधवेशी गुप्तपणे विवाह केला’ अशी तार भारतात आली होती. ही तार वाचून कार्यकर्ते कमालीचे अस्वस्थ झाले होते. ही गोरीबाई बाबासाहेबांना चळवळीत राहू देईल की नाही, की ती बाबासाहेबांना इंग्लंडला घेवून जाईल? अशा अनेक शंका-कुशंकानी त्यांना घेरले होते.
बाबासाहेब भारतात परत आल्यावर बोटीतून उतरतांना तिला सोबत आणले असेल, म्हणून लोक उत्सुकतेने पाहत होते. परंतु बाबासाहेब एकटेच उतरल्याचे दिसलेत. तारेची बातमी बाबासाहेबांना सांगितली, तेव्हा ते नुसतेच हसले!
रमाबाई गेल्यानंतर तिला बाबासाहेबांच्या प्रकृतीबद्दल चिंता वाटत होती. म्हणून बाबासाहेबांना मनस्वास्थ व कौटुंबिक सुख देण्यासाठी व त्यांचा जीवघेना आजार आटोक्यात आणण्यासाठी ती हळवी झाली होती. त्यामुळे खरंच .तिला बाबासाहेबांच्या जीवनात प्रवेश करण्याची उत्कट इच्छा झाली होती. परंतु बाबासाहेब विचारी, गंभीर, संयमी आणि सदाचारी होते. ’चारित्र्य’ जपणारे महापुरुष होते. फ्रेनीमधल्या ’स्त्री’ पेक्षा तिच्यामधल्या निर्भेळ मैत्रीला जपणारे होते. फ्रेनीची तळमळ, उत्सुकता जाणूनही हा विचारी, धिरगंभीर, संयमी पुरुष विचलीत झाला नाही. परिस्थितीने बाबासाहेबांना बांधून ठेवले होते. अनेक सुखापासून त्यांना वंचित ठेवले होते. शेवटी फ्रेनीचं १९४४ मध्ये निधन झाल्यावर त्या कायमच्या बाबासाहेबांपासून दूर निघून गेल्यात.(संदर्भ- पत्राच्या अंतरंगातून: डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लेखिका- डॉ. माधवी खरात)
त्यानंतर बाबासाहेबांनी १५ ऎप्रील १९४८ रोजी डॉ. सविता (शारदा) कबीर सोबत दुसरा विवाह केला, एवढेच लोकांना माहिती आहे. पण, हा विवाह कोणत्या परिस्थितीमध्ये केला याची माहिती मात्र लोकांना नाही. बाबासाहेबांचे आयुष्याच्या शेवटपर्यंत खाजगी सचिव असलेल्या नानक चंद रत्तू यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लिहिलेल्या आठवणींच्या पुस्तकात या बाबतीत लिहिलेले आहे. .
बाबासाहेब मुंबईला डॉ. माधव मावळंकर यांच्या दवाखान्यात १९४८ मध्ये दाखल झाले होते. तेव्हा त्यांनी मधुमेहाच्या आजारावर रोज इन्सुलिनचे इंजेक्शन घेणे गरजेचे आहे असे बाबासाहेबांना सांगितले होते. तेव्हा तुमची शुश्रूषा करेल अश्या स्त्री सोबत तुम्ही एकतर लग्न करा किवा तुमच्या सोबत एखादी स्त्री परिचारिका म्हणून ठेवा अशी सुचना डॉक्टरांनी केली. तेव्हा बाबासाहेब म्हणाले की, “ माझ्या समाजातील सार्याच स्त्रिया मला बाबा म्हणतात. मी कुणाशी लग्न करु?”
अशावेळी डॉ. सविता कबीर बाबासाहेबांना भेटल्या. त्यांनी परिचारिका म्हणून बाबासाहेबांसोबत दिल्लीला येण्याची आणि तेथे त्यांची शुश्रूषा करीत महिनाभर राहण्याची तयारी दर्शवली.
बाबासाहेबांनी त्यांची सुचना मान्य न करता त्यांना लिहिलेल्या पत्रात बाबासाहेबांनी लिहिले की, “एखादी स्त्री माझी शुश्रूषा करण्यासाठी माझ्या जवळ असावी, याबद्दल तुम्ही जे विचार मांडले आहेत, ते मला मुळीच स्वागतार्ह वाटलेले नाहीत. या बद्दल मला माफ करा. मी कमालीच्या नैतिक आणि धार्मिक वातावरणात लहानाचा मोठा झालो आहे. त्यामुळे अवांछनिय संबंधांची जाहीर चर्चा निर्मान होईल, असा प्रस्ताव तर सोडाच, पण साधा विचारही मी करू शकत नाही. सार्वजनिक जीवनातील माझी प्रतिमा स्वच्छ चारित्र्याचा आणि निष्कलंक नीतिमत्तेचा व्यक्ती या लौकिकावर उभी राहिलेली आहे. माझे शत्रू सुध्दा मला घाबरत असतील आणि माझा आदरभाव करत असतील, तर ते याच कारणाने! त्या लौकिकाला तडा जाण्याची जराही शक्यता ज्यात असेल, असे काहीही माझ्या हातून कदापिही घडणार नाही. माझी पत्नी गेली, तेव्हा मी अविवाहित राहण्याची प्रतिज्ञा केली होती. ती मोडावी लागली तर, मी विवाह करीन, पण कोणत्याही परिस्थितीत आणि विशेषत: घरात दुसरी कोणी स्त्री नाही, अशा वेळी परिचारिका किंवा साथीदार ठेवण्याची सूचना मी मुळीच मान्य करणार नाही.”
डॉ. कबीर आणि बाबासाहेब यांच्यात जवळपास चार महिने पत्रव्यवहार झाला. आपल्या पत्नी बद्दलच्या अपेक्षा व्यक्त करतानाच, त्यांनी स्त्रियांबद्दलचा आपला प्रचंड आदरभाव या पत्रात व्यक्त केला आहे. या बाबतीत त्यांनी दादासाहेब गायकवाड व त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांशी सल्लामसलत करुन त्यांचे मत विचारात घेतले.
डॉ. कबीर आणि बाबासाहेब यांचा विवाह झाला. डॉ. सविता कबीर या माईसाहेब आंबेडकर म्हणून, बाबासाहेबांच्या जीवनात आल्या. निकोप चारित्र्याला जपणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे हे विलक्षण हिमालयाच्या उत्तुंग उंचीचे व्यक्तिमत्व होते!
http://rkjumle.wordpress.com/2011/05/19/%E2%80%99%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E2%80%99-%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%81/
Comments
Post a Comment