इंग्लंडसारख्या पाश्चात्य देशातही
इंग्लंडसारख्या पाश्चात्य देशातही पूर्वी आंग्ल, पीक्ट, सॅक्सन, केल्ट अशा विविधवंशीय लोकांत संघर्ष होता. "वॉर ऑफ रोझेस" ही लढाई श्वेत आणि पीत यांच्यातच झाली. परंतू पूर्वजांप्रमाणे आजची पिढी संघर्ष करीत नाही. पूर्वजांसोबत वंशीय संघर्ष त्यांनी संपविल्याचे दिसते. उलट भारतात मात्र ऋषीमुनींनी केलेली भांडणे आजही ऋग्वेदी-यजुर्वेदी यांच्यात चालू आहेतच. पेशवाईत देखील जातीय स्वार्थासाठी भांडणे होत होतीच. त्यामुळे जातीजातीत द्वेषभावना निर्माण होऊन ती कायम राहत असे. याचा परिणाम समाजात अनेक चांगल्या सुधारणा करणे अशक्य होते.
रुढी, प्रथा यांच्यातील दोष समजून न घेताच त्या रुढींचे पालन न करणारी व्यक्ती जातीबाह्य, बहिष्कृत ठरते. हिंदू समाजात या भीतीपोटीच प्रथांचे आचरण कायम राहते. आपल्या जातीतील कोणत्या रुढी वाईट आहेत, हे कुणाला कळत नाही, असे नाही. पण त्या मोडून आपण वागलो तर आपल्यावर जाती बहिष्कार टाकतील ? मग आपल्या मुला मुलींचे लग्न कशी होतील ? या भीतीने जो तो वाईट रुढीला चिकटून बसतो.
जातीभेदांमुळेच हिंदू समाजाचा विकास खुंटला आहे. हिंदू समाजातील दुष्ट रिवाजामुळे गेल्या काही वर्षात अनेकांनी मुसलमान व ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे. त्यामुळे ख्रिस्ती आणि मुस्लीम समाजाची संख्या वाढत आहे. कुठल्याही परधर्मातील लोकांना हिंदु धर्मात येण्यास काहीच आडकाठी नाही. पण त्याला कोणत्या जातीत घ्यावे, असा प्रश्न उभा राहतो. तसेच त्याची आधी शुद्धीही करुन घ्यावी लागते. हिंदू धर्मानुसार जात ही जन्माने प्राप्त होत असते, म्हणून शुद्धीकृत हिंदूला कोणतीच जात पत्करु शकत नाही. म्हणून हिंदू जातीत येण्यास सहसा कुणी तयार होत नाही. हे सर्व टाळण्यासाठी जातीभेदाचे उच्चाटन करणे अत्यंत आवश्यक आहे.
-विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर.
धन्यवाद- Sumedh Nagarale भाऊ
------------------------------------------------
------------------------------------------------
Comments
Post a Comment