" त्यागमूर्ती माता रमाई "


डॉ. बाबासाहेबांचे जीवन म्हणजे एक धगधगते जीवन होते . त्यांच्या जीवन सागरात अनेकदा तुफानी वादळे उठ्लीत . परंतु त्यात सापडलेली त्यांची जीवन नौका रमाबाईंनी स्वतः अनेक विपत्तींशी झगडून प्रत्येक वादळातून निर्विघ्नपणे पार नेली. आपल्या तारुण्याची बहुतेक सर्व वर्षे पतीनिष्ठ रमाबाईंनी संकटांशी धैर्याने सामोरे जाऊन घालविली . रमाबाईंनी बाबासाहेबांच्या ध्येयपथातील काट्यांची झाडलोट करून त्यांचा ध्येयवादी खडतर मार्ग अधिक सुगम बनविला पतीच्या स्वीकृत कष्टमय जीवनात त्यांनी प्रामाणिकपणे साथ दिली. आपल्या कौटुंबिक सुखासाठी त्यांनी बाबासाहेबांकडून कसलीही अपेक्षा केली नाही . उलट बाबासाहेबांच्या प्रत्येक लहान -मोठ्या कार्यात त्यांना यथाशक्ती प्रोत्साहित करून व स्फूर्ती देऊन त्यांच्या मागे सावलीसारख्या सतत उभ्या राहिल्या .
माता रमाईची प्रकृती काही ठीक नसायची त्या नेहमी आजारी असत , तेव्हा एकदा बाबासाहेबांनी त्यांना धारवाड येथे हवापालट करण्यासाठी पाठविले . धारवाडच्या वसतिगृहाचे अध्यक्ष बळवंतराव वराळे हे होते. धारवाड येथे दलित विद्यार्थ्यांचे वसतिगृह होते .ते पाहण्याची इच्छा रमाबाईंनी केली . आणि त्या वसतिगृहाला भेट देण्यासाठी गेल्या , वसतिगृहाच्या स्वयंपाक गृहावर रमाबाई स्वतः देखरेख करू लागल्या मुलांना स्वतः भोजन वाढत होत्या , एकदा वसतिगृहाच्या मुलांवर उपासमारीची वेळ आली , भोजन बंद पडले , तेव्हा माता रमाईंनी स्वतःच्या हातातील सोन्याच्या बांगड्या काढून दिल्या , व्यवस्थापकाने त्या मोडून मुलांच्या भोजनाची व्यवस्था केली . तेथील वातावरणात त्यांची प्रकृतीत सुधारणा झाली . वसतीगृहातल्या सर्व विद्यार्थ्यांना रमाबाई च्या रुपात प्रत्यक्ष आईच मिळाली .
आणि काही दिवसात त्या परत मुंबईला आल्या परंतु वैवाहिक जीवनाच्या प्रारंभीच्या काळात त्यांच्यावर उपासमार , हालाअपेष्टा , दुःख , दारिद्र्य व चिंता यांचे जे प्रसंग ओढवले , त्यांना रमाबाईंनी धैर्याने तोंड दिले होते. परंतु त्या सर्व परिस्थितीचा त्यांच्या शरीरावर -प्रकृतीवर जो अनिष्ट परिणाम झाला, तो मात्र शेवटपर्यंत तसाच कायम राहिला आणि म्हणून त्यांची तब्बेत हळूहळू खालवत जात होती . त्यांची काया म्हणेज केवळ हाडांचा एल जिवंत सांगाडा बनली होती.
आणि काही दिवसातच त्यांनी अंथरूण धरले . त्यांचा आजार बराच वाढला . रमाबाईंना अनेक डॉक्टरांचे औषधोपचार चालू होते. त्यांच्या प्रकृतीत चढऊतार सतत चार महिने होत गेले. मे महिण्याच्या २२ तारखेस प्रकृतीत चिंताजनक फरक झालेला दिसून आला. त्यावेळी साहेब पनवेलला मुलांचे वस्तुगृह स्थापन करण्याच्या कामासाठी गेले होते. डॉ. बाबासाहेबांना मुंबईला तातडीने बोलावण्यात आले बाबासाहेब २४ तारखेस मुंबईस आले. आल्यापासून ते रमाबाईंच्या जवळ बसून होते. रमाबाई साहेबांकडे टक लावून बघत . त्यांना बोलण्याचे त्राण नव्हते. साहेब स्वतःच रमाबाईंना औषधे देत होते, बशीत कॉफी ओतून त्यांना ती पिण्याचा आग्रह करीत होते .मात्र रविवारी , ता. २७ मे १९३५ ला रमाबाईंनी डोळे मिटले. त्यांचा श्र्वासोच्छवास जड होऊन मंदावला. शेवटी त्या मातेचे पंचप्राण सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास पंचत्वात विलीन झाले . घरातील लोकांनी हंबरडा फोडला . " रामू , तू मला सोडून गेलीस, तुला मी काही सुख दिले नाही . तू माझ्यासाठी खस्ता खाल्ल्यास , त्याग केलास. ! " असे म्हणून बाबासाहेब ओक्साबोक्शी रडू लागले.
त्यांच्या शोकाकुल आवाजाने राजगृह व आसपासचे वातावरण शोकसागरात बुडून गेले. रमाबाईंच्या मृत्यू ची वार्ता हां हां म्हणता साऱ्या मुंबईत पोहोचली अस्पृश्य समाजातील , गिरण्यातून व कारखान्यांतून काम करणाऱ्या लोकांनी ताबडतोब काम बंद केले व राजगृहाजवळ गोळा झाले. सारा अस्पृश्यवर्ग आपल्या लाडक्या आईच्या वियोगाने अश्रू ढाळीत उभा होता.
स्मशानात नेण्याची लोक तयारी करू लागले . तेव्हा डॉ. बाबासाहेब त्यांना म्हणाले , " रामूला पांढरी पातळे फार आवडत असत. तिला चांगले शेवटचे पांढरे पातळ आणा ! "प्रेतयात्रा राजगृहापासून वरळीच्या स्मशानभूमीकडे दुपारी दोन वाजता निघाली . त्यावेळी ४०-५० हजारांचा लोकसमुदाय सामील झालेला होता. यशवंत रडत रडत चालत होता . स्मशानात अग्नी संस्कार झाल्यानंतर पुन्हा साहेबांनी टाहो फोडला . लोकांनी त्यांची समजूत घातली . ते सर्वजन राजगृहात परत आले. २७ मे ची रात्र बाबासाहेबांना आपल्या पत्नीच्या अनेक आठवणी येऊन दुःखाचे उमाळे येत होते डोळ्यातून अश्रू अखंड ठिपकत होते.
दुसऱ्या दिवसापासून राजगृहावर बाबांच्या सांत्वनासाठी लोकांचे थवेच्या थवे येऊ लागले. बाबासाहेबांचा दुःखाने म्लान झालेला चेहरा पाहून लोकांना देखील भडभडून येई.
रमाबाईंच्या मृत्यूची पहिली शोकसभा बाबासाहेबांचे कुटुंब ज्या चाळीत राहत होते तेथील महिला समाजातर्फे शनिवार , ८ जून १९३५ रोजी ८-३० ला भरविण्यात आली .
बाबासाहेबांना रमाबाईंची आठवण आली कि गहिवरून येत असे आणि ते म्हणत असत " तिने माझ्यासाठी अपार कष्ट सहन केले . उपास काढले, एका वस्त्रानिशी घरात राहिली . मला आमच्या मुलांना वाचविण्यासाठी काही करता आले नाही. मी प्रकांडपंडित झालो , पण कुटुंबासाठी मी काहीच करू शकलो नाही ! " अशा प्रकारचे उद्गार त्यांच्या तोंडून निघत असत .रमाबाईच्या मृत्यूने त्यांच्या आयुष्यात एक मोठी पोकळी निर्माण झाली होती.
अशा ह्या महान मातेच्या स्मृतीदिनी विनम्र अभिवादन व कोटी कोटी प्रणाम !!!
! जय भीम ! !! जय भारत !! !!! नमो बुद्धाय !!!
---------------सविता राजेंद्र बाविस्कर --------------

Comments

Popular posts from this blog

जेष्ठ पौर्णिमा भगवान बुद्धांच्या जीवनात महान ठरली आहे

ग्रंथालय

ग्रंथालय व माहितीशास्त्रातील नवे प्रवाह