" हिंदू कोड बिल "

" हिंदू कोड बिल "
हिंदू समाजाला लागू पडणारा हिंदू कायदा हा ब्रिटीश अमदानीत तयार करण्यात आला . हिंदू कुटुंबपद्धतिच्या मालकीची जी स्थावर -जंगम मालमत्ता असेल तिची व्यवस्था व वाटपपद्धती कशी असावी यासंबंधी अनेक धर्मशास्त्रपंडितांनी टीका लिहिल्या .त्यात जे नियम केले त्यात दोन नियमपद्धती भारतातील निरनिराळ्या प्रांतात चालू होत्या . १ )' मिताक्षर ' २ ) ' दायभाग '
'दायभाग' हि पद्धत फक्त बंगालमध्ये प्रचलित झाली. दायभाग पद्धातीखाली मुलाला (मुलांना ) वारसाहक्क फक्त वडिलांच्या मृत्युनंतर मिळू शकतो . आणि 'मिताक्षर ' या पद्धतीखाली वारसाहक्क पुत्रपौत्रादि वंशज आणि संपिड ( एका रक्ताचे नातेवाईक ) यांना मिळतो वडील हयात असतांनाहीहा हक्क मुलाला ( मुलांना ) मिळू शकतो .
स्त्रियांना पोटगीचा हक्क आहे . हि पोटगी देणे लागू नये म्हणूनच एक मार्ग धर्ममार्तंडांना सुचला , तो म्हणजे स्त्रियांनी सती जाणे . बंगालमध्ये सतीची चाल फार प्रबळ होती .
स्त्रियांच्या बाबतीत वारसाहक्क व विवाह यांसंबंधी तर अनेक अन्यायमुलक कायद्यांची कलमे आहेत त्यात योग्य ती दुरुस्ती व्हावी असे समाजसुधारक व स्त्रियांच्या संस्था यांना वाटत होते, त्याप्रमाणे चळवळीहि करण्यात आल्या . या कलमांना दुरुस्त्या सुचविणारी अनेक बिले मध्यवर्ती कायदेमंडळात आणली गेली .
हिंदू स्त्रियांना एकत्र कुटुंबापासून स्वतंत्र राहण्याचा हक्क असावा व त्यांना त्या कुटुंबाच्या एकत्र स्थावर -जंगम मालमत्तेतून पोटगी मिळावी . असे विधेयक डॉ. देशमुख यांनी आणले होते, पण ते मंजूर झाले नाही. हिंदू कायद्यात सर्व प्रकारची इष्ट सुधारणा झाली पाहिजे अशी त्यांनी चळवळ सुरु केली व सरकारकडे याबाबत मागणी केली.या सर्व सूचनांचा विचार करून सरकारने १९४१ साली ' दि हिंदू कोड कमिटी ' नेमली. आणि सर्व हिंदू स्त्रियांना समान हक्क देण्यात यावेत हे या समितीचे प्रमुख काम होते.
त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कायदे मंत्री होते .कायदेमंत्री म्हणून हिंदू कोडला कायदेशीर भाषेची लेणी लेवविण्याचे प्रमुख काम त्यांच्याकडे आले. ते काम ते अत्यंत काळजीपूर्वक व सचोटीने करत होते. त्यादिवसात त्यांची प्रकृती सुद्धा बरी नव्हती तरीही त्यांनी 'हिंदू कोड बिलासाठी खूप मेहनत घेतली हजारो विरोधकांशी चर्चा करून त्यांची बाजू कशी चुकीची व समाजाला हानिकारक आहे , हे पटवून देण्याचे ते मनापासून प्रयत्न करीत होते. एकीकडे राज्यघटना व दुसरीकडे हिंदू कायदा ह्या दोन बहुमुल्य देणग्या त्यांनी भारताला दिल्या आहेत . हिंदू कायदा सर्वांगसुंदर व्हावा म्हणून ते प्रत्येक कलम नीट तपासून , पुनः पुन्हा लिहून काढत असत . अशा रीतीने प्रचंड मेहनत करून बाबासाहेबांनी हे बिल तयार केले .
' बिल लोकसभेत येणार ! येणार ! ! ' असा गाजावाजा वर्तमानपत्रातून होऊ लागला .
परंतु जस जसे हिंदू कोड बिल मंजूर होणार असे विरोधकांना समजले तेव्हा ते चिडून बोलले कि हिंदू कोड बिल आमच्या धर्मावर घाला घालीत आहे. 'आंबेडकर हे अस्पृश्य म्हणजे अवर्ण ; त्यांच्या हातून स्मृतीशास्त्रात फेरफार आम्ही होऊ देणार नाही .जीर्णमतवाद्यांचा विरोध वाढू लागला .
हिंदू कोड बिलाला विरोध करणाऱ्यांचे तीन वर्ग होते. एक सनातनी , दुसरा वर्ग राजकीय पुढाऱ्यांचा , आणि तिसरा वर्ग सवर्ण हिंदुतील वर्णश्रेष्ठत्वाने पछाडलेल्या लोकांचा . हे बिल पास झाले तर याचा परिणाम असा होईल कि, ज्या हिंदुधर्मशास्त्रांचे संहितीकरण आतापर्यंत वर्णश्रेष्ठ हिंदूला करता आले नाही ते एका अस्पृश्य पंडिताने केले , यात आपली नामुष्की होणार आहे. हे बिल जर पास झाले तर बहुजन समाज त्याला ' आंबेडकर स्मृती ' म्हणून संबोधिल आणि देशाच्या भावी इतिहासात हेच नमूद करण्यात येईल . म्हणून ह्या बिलाला विरोधकांनी विरोध केला .त्यात जरी त्यांचे हेतू निरनिराळे होते तरी त्यांचा परिणाम एकच झाला, तो म्हणजे प .नेहरू मंत्रिमंडळ विरोधाला घाबरले व 'बिल ' नामंजूर झाले.
जीर्णमतवाद्यांचा चोहोकडून हल्ला होत असतांनाही बाबासाहेब अजिबात घाबरले नाहीत ते म्हणाले ' मी जसे बिल तयार केलेले आहे तसेच ते मंजूर झाले पाहिजे या आपल्या मुळ भूमिकेला बाबासाहेब चिकटून राहिले होते. प. नेहरूंनी बाबासाहेबंसोबत चर्चा केली . बाबासाहेब आपल्या भूमिकेपासून तुसभरहि दूर सरण्यास तयार नव्हते. बाबासाहेब खूप संतापले . दोन (२ ) वर्षे रात्रंदिवस जीवापाड मेहनत करून बिल तयार केले आणि त्याचा शेवट असा झाला,हे पाहून बाबासाहेबांना मनस्वी वाईट वाटले .
हिंदू कोड बिलाची अशी दुर्दशा झाली आणि त्याबद्दल कोणालाही फारसे वाईट वाटलेले नाही हे पाहून बाबासाहेबांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याचे ठरविले . आणि तसा सविस्तर राजीनामा देण्याचे पत्र १०-८-१९५१ ला लिहले. बाबासाहेबांनी राजीनामा दिल्याबद्दल विचारी आणि पुरोगामी विचारसरणीच्या लोकांना फार वाईट वाटले. बाबासाहेबांच्या विद्वत्तेचा व बुद्धिमत्तेचा देशाला व हिंदी समाजाला जास्तीत जास्त उपयोग होण्याची सुवर्णसंधी हातातून निसटली असे उद्गार काहींनी बाबासाहेबांबद्दल काढले .' विद्वान आणि दुरगामी विचारसरणीचा नेता ' म्हणून बाबासाहेबांची स्तुती केली .बाबासाहेब आंबेडकरांसारख्या स्वयंप्रकाशित पंडिताला मंत्रिमंडळातून बाहेर पडावे लागले , त्यामुळे मंत्रिमंडळातील प्रकाशझोत मंदावला ' .
! जय भीम ! !! जय भारत !! !!! नमो बुद्धाय !!!
---------सविता राजेंद्र बाविस्कर --------
https://www.facebook.com/groups/allscstobc/permalink/774458912564409/

Comments

Popular posts from this blog

जेष्ठ पौर्णिमा भगवान बुद्धांच्या जीवनात महान ठरली आहे

ग्रंथालय

ग्रंथालय व माहितीशास्त्रातील नवे प्रवाह